दिनकर रायकर, पद्मभूषण देशपांडे, प्रकाश जोशी आदींना राष्ट्रवादीचा पुरस्कार
४ फेब्रु./मुंबई
राष्ट्रवादी संकल्प या हिंदी साप्ताहिकाने पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली आहे.
पुरस्कारप्राप्त पत्रकार -
पत्रकारिता जीवनगौरव - दिनकर रायकर (संपादक, लोकमत)
मराठी पत्रकारिता - पद्मभूषण देशपांडे (मुख्य वार्ताहर, सकाळ)
इंग्रजी पत्रकारिता - प्रकाश जोशी (टाइम्स ऑफ इंडिया)
हिंदी पत्रकारिता - बृजमोहन पांडे (नवभारत)
गुजराती पत्रकारिता - पिंकी दलाल (संपादक, मुंबई समाचार)
उर्दू पत्रकारिता - सर्फराज आरजू (संपादक, हिंदुस्थान)
५१ हजार रुपये आणि मानपत्र असे जीवनगौरव पुरस्काराचे, तर ११ हजार रुपये आणि मानपत्र असे अन्य पुरस्कारांचे स्वरूप आहे.
येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता चर्चगेट येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सी. के. नायडू सभागृहात विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तारीक अन्वर हे या साप्ताहिकाचे संपादक आहेत.
नवप्रभाचे माजी संपादक शांताराम बोकील यांचे निधन
४ फेब्रु./पणजी
जुन्या पिढीतील एक ध्येयवादी पत्रकार व दैनिक नवप्रभाचे माजी संपादक शांताराम बोकील (वय ८२) यांचे काल शाहूवाडी-कोल्हापुर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
पत्रमहर्षी श्री. द्वा. भ. कर्णिक यांच्या कारकिर्दीत नवप्रभेच्या सुरवातीच्या संपादकीय कर्मचाऱ्यांपैकी असलेले श्री. बोकील पाच वर्षे सहसंपादक पदावर होते. श्री. कर्णिक यांचा कार्यकाल पूर्ण होताच ते नवप्रभेचे कार्यकारी संपादक बनले. एक वर्ष कार्यकारी संपादक पदावर राहिल्यानंतर सुमारे एक वर्ष ते संपादकपदावर होते. त्यानंतर त्यांनी पुढारी, नागपूर पत्रिका अशा दैनिकांत काम केले. श्री. बोकील यांना शेती या विषयात विलक्षण आस्था होती. महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य कोल्हापुरात होते.
चंद्रशेखर कुलकर्णी, दिनेश गुणे लोकमतमध्ये
३ फेब्रु./मुंबई
ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी, तसेच दिनेश गुणे लोकमतमध्ये दाखल झाले असल्याचे समजते. लोकमतमध्ये न्यूजब्युरो स्थापन करण्यात येत असून, हे दोघे त्याचे काम सांभाळतील असे कळते.
चंद्रशेखर कुलकर्णी हे यापूर्वी लोकसत्ताचे सहसंपादक होते. साधारणतः दीड महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता ते लोकमतचे सहसंपादक म्हणून काम पाहतील.
दिनेश गुणे हे ज्येष्ठ वार्ताहर असून, ते सकाळ न्यूज नेटवर्कचे मुंबईतील प्रतिनिधी होते. लवकरच त्यांच्याकडे सकाळच्या सहसंपादकपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार होती, असे सांगण्यात येते. मात्र तत्पूर्वीच त्यांनी सकाळला रामराम ठोकला.
दरम्यान, लोकमतच्या राज्यभरातील आवृत्यांना अधिक दर्जेदार मजकूर पुरवणे, हे लोकमत न्यूजब्युरोचे मुख्य काम असणार आहे, असे सांगण्यात येते. त्या दृष्टिकोनातूनच या ब्युरोची जबाबदारी चंदू कुलकर्णी, दिनेश गुणे यांच्यासारख्या अनुभवी पत्रकारांकडे सोपविण्यात येत असून, त्यात आणखी काही बातमीदारांची भर्ती करण्यात येणार असल्याचे कळते.
पत्रकारांच्या संरक्षणाचा अध्यादेश लवकरच
३ फेब्रु./मुंबई
पत्रकारांच्या संरक्षणाच्या कायद्याचे विधेयक विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मांडण्यात येईल. तत्पूर्वी येत्या १५ दिवसांच्या आत तसा अध्यादेश काढण्याचा निर्णय गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्र अय्यंगार, विधी व न्याय विभागाचे सचिव ह. बा. पटेल, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव, सह पोलिस आयुक्त हिमांशु रॉय आदी; तसेच पत्रकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मनीष केळकर यांच्या आत्महत्येच्या कारणांचे गूढ
३ फेब्रु./मुंबई
सामनाचे वरिष्ठ उपसंपादक मनीष केळकर यांच्या आत्महत्येमागे नेमकी कोणती कारणे असावीत, याबाबत सध्या मुंबईतील पत्रकारविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे.
कार्यालयातील वरिष्ठांच्या छळास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती असे याआधीच्या कळते-समजतेच्या बातमीत म्हटले होते. त्याचबरोबर मनीष यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती व त्यात आपल्या वरिष्ठांची नावे नमूद केली होती, असेही त्या बातमीत म्हटले होते. मनीष यांच्या काही सहका-यांनी दिलेल्या माहितीवरुन ती बातमी देण्यात आली होती. मात्र नंतर, तशी कोणतीही चिठ्ठी मनीष यांनी लिहिली नव्हती असे स्पष्ट झाले. त्यामुळे ती चुकीची माहिती असलेली बातमी कळते-समजतेवरून काढून टाकण्यात आली. (याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. - ब्लॉगएडिटर)
असे असले, तरी मनीष यांना कार्यालयात त्रास देण्यात येत होता, विद्याधर चिंदरकर त्याचा छळ करीत होते व त्यामुळेच मनीष यांनी आत्महत्या केली, असा आरोप मनीषचे वडील, सामनाचे मुख्य छायाचित्रकार सुरेश केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. याबाबत पोलिस चौकशी सुरु आहे. दुसरीकडे मनीषच्या आईने पोलिसांनी दिलेल्या जबानीत, मनीषने आत्महत्या करण्यापूर्वी आपण घर सोडून जात आहोत, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे या आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, मनीषसारख्या तरूण पत्रकाराची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना असून, कार्यालयीन छळामुळे त्यांनी स्वतःचे जीवन संपविले असेल, तर त्यास जबाबदार असणारांना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र तसे नसेल, तर विनाकारण कोणाची बदनामी होऊ नये, अशा प्रतिक्रिया पत्रविश्वातून उमटत आहेत.


